स्त्री शक्ती

भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची.
स्त्री आणि पुरूष यांच्यात केवळ शरीरभेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील, श्रध्दावंत आहे, तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरूषाचे लक्ष्य मात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते.
राजा जनकाच्या राजसभेत याज्ञवलक्याला कसे प्रश्न विचारण्यात आले होते. ते तुम्हाला आठवते का? त्यांना प्रश्न विचारण्यापैकी प्रमुख होती वाचवनवी नामक एक कुमारी मोठी वाक्पटू होती. त्या काळी अशा स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हणत. एखाद्या कुशल धनुर्धराच्या हातात चमकणारे दोन बाण असावेत तसे माझे प्रश्न आहेत असे ती म्हणाली. त्या ठिकाणी तिच्या स्त्रीत्वासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही.
तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरूषांप्रमाणे उक्ते मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा थोडक्यात प्रवास १९५० मध्ये प्रेम माथुर यांना भारतातील पहिल्या व्यावसायीक महिला वैमानिक होण्याचा मान, १९५२ च्या ऑलिपिंक स्पर्धामध्ये पुरूष व महिलांना एकत्र खेळण्याची संधी, भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान, भारतीय पोलिस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड पोलिस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिल्या महिला, मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश, भारताच्या राष्ट्रपती पदी महिलेची निवड प्रतिभाताई पाटिल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण.
स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर, सुनिता विल्यम्‌स, अंजु जॉर्ज, कल्पना चावला, सानिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल याबरोबर, रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणे, बसे कंडक्टर, पत्रकारिता, फायरब्रिगेड ही क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत.
सध्या भारतात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला आहेत. आताच राष्ट्रकूल स्पर्धामध्ये भारतीय महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सध्या राष्ट्रीय राजकारणांत महिलांची संख्या नगण्य आहे. आर्थिक क्षेत्रातही अनेक महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहे. संशोधन क्षेत्रातही महिलांची संख्या वाढतेय ही चांगली गोष्ट आहे.
त्याचप्रमाणे समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात पडते असं म्हणतात. चित्रपट हे माध्यम जनसामान्यांवर प्रभाव टाकतं. काळाबरोबर चित्रपटातील नायिका बदलत गेली. विशेष म्हणजे चित्रपटातील हे बदल समाजामध्ये स्त्रीनं घडवून आणलेल्या बदलांच प्रतिबिंब आहे. स्वातंत्र्यापूर्वी ‘फिअरलेस’ १९१३-४७ एक स्त्री अन्यायाचा प्रतिकार करीत, गुडांना लोळवत या काळात रूपेरी पडदा गाजवत होती. टारझन, जेम्स, बॉंड, रँबो यांनीही मान खाली घालावी असं तिच कर्तृत्व होतं. ‘फिअरलेस नादिया’.. पळत्या टांग्यात उडी मारणं, तलवारबाजी, भालाफेक, पळ्त्या रेल्वेतून उड्या मारणं असे तिचे अचाट कृत्य स्त्रीच्या नाजुकपणाच्या सर्व कविकल्पना या स्त्रीने तलवारीच्या एका फटक्यात उधळून लावल्या. त्या काळात अहिल्या उद्धार (१९१९) सारखे काही स्त्री प्रधान चित्रपटही बनले. मात्र स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभुमीवर तिचा दुर्गावतारच अधिक अधोरेखित झाला.
स्त्रीपटांचच राज्य १९४८-५६
या काळात अन्यायाचा प्रतिकार करणारी बाई स्वातंत्र्य मिळेपर्यंत अचानक बदलली या काळात स्त्री पटांनी चित्रपट सृष्टीवर राज्य केले. सती पार्वती, सती अनुसया, सती सावित्री, सती सिता, सती नर्मदा हे चित्रपट त्यांच बोलकं उदाहरण. नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावं म्हणून स्त्रीया उपवास करतात. वटपौर्णिमा, करवाचौथ, शिवरात्र आदींच चित्रण आणि उदात्तीकरण या चित्रपटातून पाहायला मिळेल.
देवदास, भाभी की चुडिया, सीमा व मिस्टर और मिसेस ५५ या चित्रपटातून तिचं प्रेम, संघर्ष व बिनधास्त रूपही पाहायला मिळालं. भाभी की चुडिया सारख्या चित्रपटातून संसारामध्ये रमलेली स्त्री दाखविण्यात आली.
आईची व प्रेमाची महती १९५७-६७
या दशकाच्या सुरवातीला प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ या मेहबूब खान दिग्दर्शित चित्रपटाने आईची महती गायली. नर्गीस दत्त यांच्या अविस्मरणीय अभिनयानं हा चित्रपट गाजला. जन्मभुमी व आईची तुलना करणारा हा चित्रपट स्त्रीला खुप मोठं करून गेला. मीनाकुमारी व गुरुदत्त यांच्या साहब, बीबी और गुलाम या चित्रपटातून स्त्रीच्या अनेक व्यथांच चित्रीकरण करण्यात आलं. जिवापाड प्रेम केलेला राजकपूरनं ‘अनाडी’ व ‘संगम’ या चित्रपटातून स्त्रीची नानाविविध रूपं दाखविण्याचा प्रयत्न केला. दिलीपकुमार-वैजंतीमालाच्या ‘मधुमती’ या चित्रपटानं स्त्रीच्या प्रेमाला आणखी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.
स्त्रीप्रधान चित्रपटाची लाट १९६८-८०
सतीपट संपले तरी स्त्रीच्या साध्वीपणाचा सिलसिला सुरूच राहिला. त्याचा पगडा जनमाणसावर बरीच वर्षे राहिला. ‘सतीपरीक्षा’, ‘दुल्हन’, ‘चरणों की दासी’, ‘मै सुहागन हूँ’, ‘सुहागन’, ‘पतिपरमेश्वर’ ही काही उदाहरणं. त्याच काळात प्रेमात पडलेल्या स्त्रिया व प्रेम निभावताना त्यांना करावा लागलेला संघर्षही चित्रित केला गेला. ‘संगम’, ‘साहब’, ‘सुजाता’ व ‘ब्रम्हचारी’ या चित्रपटातून ती प्रगल्भ होत गेली. सत्तरच्या दशकानंतर स्त्रीप्रधान चित्रपटांची लाटच आली. त्यात हेमामालिनीचा ‘सीता और गीता’, ‘बॉबी’, ‘गुड्डी’ व मराठीतील ‘उंबरठा’ हे चित्रपट उल्लेखनीय ठरले. स्त्री उंबरठा ओलांडून बाहेर पडल्याचा हा काळ होता.
अधिकारांविषयी जागरूकता १९८१-१९९०
कुटुंबात व समाजात स्त्रियांना सामोर जाव्या लागणाऱ्या ज्वलंत प्रश्नांच चित्रीकरण या कालखंडात मोठ्या प्रमाणावर झालं. ‘अंकुर’, ‘दृष्टी’ ‘अर्थ’, ‘जीवनधार’, ‘मिर्च मसाला’ आदी समांतर सिनेमांतून तिच्या अगदी व्यक्तिगत प्रश्नांवर थेट प्रकाश टाकण्यात आला. याच काळात स्त्री आपल्या अधिकाराविषयी रस्त्यावर येऊन भांडतानाही दिसली. झीनत अमान, परवीन बॉबी आदी अभिनेत्रींनी आधुनिक स्त्रीची वेगवेगळी रूपं याच काळात पेश झाली. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या स्त्रीचे अनेक प्रश्न या काळातील चित्रपटानं मांडले.
आकाशाला गवसणी घालणारी झेप १९९१-२०१०
स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री आता पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागली आहे. ‘अस्तित्व’ सारख्या चित्रपटामधुन तिनं मुलाला जन्म देण्याच्या अधिकाराबद्दल भाष्य करण्यासाठी सुरवात केली. कॉलेजमध्ये जाणारी, नोकरी-व्यवसायात अधिकारपद भूषविणारी स्त्री अनेक चित्रपटांमधून दिसू लागली. हक्क मागण्यापेक्षा मिळालेले अधिकार उपभोगतानची तिची स्वप्न चित्रपटाबरोबर समाजातही दिसत राहिली. ‘कॉर्पोरेट’ सारख्या चित्रपटातून करिअरमध्ये लागलेल्या स्त्रियांचे प्रश्न हाताळले गेले. आताची तिची झेप आकाशाला गवसणी घालणारीच आहे.
विविध क्षेत्रात मुली ठामपणे पाय रोवून उभ्या असल्याचे चित्र आज आहे. त्यामुळे आजच्या मुली कसा विचार करतात, असे मनात येते. त्यापैकी हे एक उदाहरण
सभोवताली अंधार आणि दृष्टी असुनही अंध असलेल्या समाजात त्यांनी त्यांना स्वीकारले, केवळ स्वीकारूनच त्या थांबल्या नाहीत, तर प्रेम आणि जिद्दीतुन त्यांच्या अंधारातही प्रकाशमय संसार फुलविला. दृष्टिहितांना पति म्हणून स्वीकारुन या स्त्रीयांनी नवसमाजाची निर्मिती केली. राज्यात असे असंख्य संसार आहेत. त्यापैकी हे एक बदलापुर येथील वैशाली शिंदे यांनी तर अंध तरुणाशी प्रेमातून आंतरधर्मीय विवाह करून वेगळेच विश्व निर्माण केले. शाळेत नोकरी करत असतांना त्यांची मजहर शेख यांच्याशी ओळख झाली. त्यांचे रूपांतर प्रेमात झाले. विवाहाला दोघांच्याही घरातून सुरवातीला विरोध होता. मात्र नंतर तो मावळला. आजही ते दोघे संगीताचे क्लास घेतात. त्यांना एक मुलगा आहे. ‘हिंदू-मुस्लिम’ आंतरधर्मीय विवाह असल्याने लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. मला स्वतःला असे वाटतच नाही की, “माझा नवरा हा अंध आहे. अंध असूनही मला सतत नवी दृष्टी ते देत असतात”. असे त्या अभिमानाने सांगतात.
स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यास आहे. आधुनिक जगातील या व असंख्य हिरकणींनी आयुष्याचा पर्वत जिद्द आणि संघर्षमय लढा देवून चढला आहे. त्यांच्या या संघर्षामुळेच कित्येक आयुष्य उभी राहिली आहेत. त्यांच्या या संघर्षातूनच त्यांच्या उदयाच्या आयुष्याची पहाट उगवणार आहे.
शेवटी जाता जाता एक दृष्टीक्षेप स्त्री कार्यावर
भारतातील सर्वोच्च पदावर महिला विराजमान.
जगात सर्वाधिक भारतात नोकरी करणाऱ्या महिला.
जगात सर्वाधिक महिला अभियंते भारतात.
भारतात २५० उद्योगांमध्ये महिला कार्यकारी प्रमुख.
भारतीय सैन्यात महिलांना परमनंट कमिशन देण्याची न्यायालयाची शिफारस.
उच्चा शिक्षीत पदावर काम करणाऱ्या महिलांची सर्वाधिक संस्था भारतात.
शिखा शर्मा, चंदा कोचर आणि इंदिरा नोथी यांचा जागतिक शंभर महिलांमध्ये समावेश.
शेवटी मी एवढेच सांगेल की मुलींनो, हे शतक तुमचे आहे. संधी गमावू नका. पुढे या आणि तुमची सकारात्मकता, मौलिकता जगाला दाखवा. स्वतःला सिद्ध करून जगाला पटवून द्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें